स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पुतळ्याच्या चौथऱ्याभोवती कचरा, सुकलेला पालापाचोळा व इतर घाण साचलेली असून त्यामुळे परिसराचे सौंदर्यही कमी झाले आहे. महापुरुषांच्या स्मारकाला शोभेल अशी स्वच्छता आणि देखभाल करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
विशेषतः राष्ट्रीय सण, जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी येथे अनेक नागरिक अभिवादनासाठी येतात. मात्र अशा अस्वच्छ वातावरणामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. संबंधित ठिकाणी नियमित साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट आणि परिसराचे सुशोभीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
दरम्यान, अंबाडी ग्रामपंचायतीने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन पुतळा परिसराची स्वच्छता करावी तसेच भविष्यात नियमित देखभालीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.